SSC HSC Board Exam 2026 तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी इयत्ता १० वी किंवा १२ वी ची परीक्षा देणार असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या बातमीमुळे हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान टळणार असून, परीक्षा केंद्रावर आता कडक शिस्त आणि सुरक्षित वातावरण मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच, म्हणजेच ९ जानेवारी २०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी १० वी आणि १२ वी च्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार किंवा कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी सरकारने आता कंबर कसली आहे. यासाठी राज्य स्तरावर एक विशेष (State Level Vigilance Committee) स्थापन करण्यात आली आहे.
आता परीक्षा होणार ‘कॉपीमुक्त’
आजवर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या काम करत होत्याच. पण, संपूर्ण राज्यामध्ये एकवाक्यता यावी आणि परीक्षा अजून पारदर्शक व्हाव्यात, यासाठी राज्य स्तरावर स्वतंत्र समितीची गरज होती. म्हणूनच आता शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही नवी समिती काम करेल.
या समितीचा मुख्य उद्देश हाच आहे की, परीक्षा केंद्रावर तणावमुक्त आणि निकोप वातावरण असावे, जेणेकरून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.
१० वी १२ वी परीक्षा केंद्रांसाठी नवीन नियम जारी
सरकारने (Copy Free Exam Campaign) अतिशय गांभीर्याने राबवण्याचे ठरवले आहे. यासाठी काही कडक नियम आणि सोयी-सुविधांची अंमलबजावणी केली जाणार आहे, ज्याचा थेट परिणाम परीक्षा केंद्रावरील वातावरणावर होईल.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला आता खालील गोष्टींची खात्री करावी लागणार आहे:
सीसीटीव्हीचा वॉच: ज्या परीक्षा केंद्रांना ‘संवेदनशील’ किंवा ‘उपद्रवी’ म्हणून घोषित केले आहे, तिथे आता सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) असणे बंधनकारक आहे. नुसते कॅमेरे लावून चालणार नाही, तर त्याचे रेकॉर्डिंग (Data Storage) होत आहे की नाही, हे सुद्धा तपासले जाईल. इतकेच नाही तर जिल्हा प्रशासनाकडे या सीसीटीव्हीचा थेट ॲक्सेस (Access) असणार आहे.
ड्रोन कॅमेऱ्यांची नजर: ही खूप मोठी अपडेट आहे. राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रांच्या बाहेर आणि परिसरात आता चक्क ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाळत ठेवली जाणार आहे. तसेच केंद्राबाहेर व्हिडिओ रेकॉर्डिंगची व्यवस्थाही केली जाईल.
झेरॉक्स दुकाने बंद: परीक्षा केंद्रापासून ५०० मीटरच्या अंतरावर असलेली सर्व झेरॉक्स किंवा फॅक्स मशीनची दुकाने परीक्षा काळात पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहेत.
वाहतूक सुरक्षा: प्रश्नपत्रिकांची ने-आण करण्यासाठी आता शासकीय वाहने वापरली जातील. तसेच प्रश्नपत्रिका वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत सुरक्षेसाठी पोलीस किंवा होमगार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी
बरेचदा कडक तपासणीमुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो, अशी पालकांची तक्रार असते. पण या शासन निर्णयात स्पष्ट म्हटले आहे की, भरारी पथकांनी तपासणी करताना विद्यार्थ्यांना कोणताही मानसिक त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.
तसेच, परीक्षा केंद्रावर बाहेरच्या व्यक्तींचा उपद्रव होऊ नये, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भरारी पथकांमध्ये आता किमान एका महिला प्रतिनिधीचा समावेश असणे आवश्यक करण्यात आले आहे, ज्यामुळे विद्यार्थिनींची तपासणी योग्य पद्धतीने होईल.
शासनाने हे स्पष्ट केले आहे की, जर कोणी परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्यास मदत केली किंवा प्रवृत्त केले, तर त्यांच्यावर Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 नुसार कारवाई केली जाईल. लक्षात ठेवा, हा गुन्हा दाखल झाल्यास तो ‘अजामीनपात्र’ (Non-bailable) असेल. त्यामुळे कॉपी करण्यास मदत करणे हे आता खूप महागात पडू शकते.
थोडक्यात सांगायचे तर, हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांसाठी हे वातावरण खूप पोषक असणार आहे. राज्य सरकार आणि शिक्षण विभाग (Copy Free Exam Campaign) यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता, फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय डाउनलोड करा
अधिक माहितीसाठी : https://www.mahahsscboard.in/








