Ayushman Card Health insurance महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी खुशखबर! आता ‘आयुष्मान भारत’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले’ या योजना एकत्र आल्यामुळे प्रत्येकाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार. जाणून घ्या, तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता.
Ayushman Card Health insurance 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा!
महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ या दोन मोठ्या योजना एकत्र करण्यात आल्या आहेत.
यामुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य उपचारांचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत कोणत्याही उत्पन्नाची अट नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या एकत्रित योजनेमुळे १३५६ प्रकारच्या आजारांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी फक्त पिवळ्या, केशरी आणि अंत्योदय रेशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळत होता, मात्र आता पांढऱ्या रेशनकार्ड धारकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. तसेच, सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे:
आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची गरज पडेल:
- तुमची अद्ययावत शिधापत्रिका (रेशन कार्ड)
- आधार क्रमांक
- आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक
आयुष्मान कार्ड कसे मिळवाल?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘आयुष्मान कार्ड’ असणे आवश्यक आहे. हे कार्ड बनवण्यासाठी सरकारकडून विविध स्तरांवर मदत केली जात आहे.
- आशा कर्मचारी: तुमच्या परिसरातील आशा कर्मचारी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी मदत करतील.
- आपले सरकार सेवा केंद्र: ‘आपले सरकार सेवा केंद्रा’तूनही तुम्ही आपले आयुष्मान कार्ड तयार करू शकता.
- स्वस्त धान्य दुकान: स्वस्त धान्य दुकान चालकसुद्धा शिधापत्रिका धारकांना कार्ड बनवून देण्यास मदत करतील.
- स्वतःहून कार्ड बनवणे: तुम्ही स्वतःही ऑनलाइन पद्धतीने कार्ड बनवू शकता. यासाठी https://beneficiary.nha.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन ‘बेनिफिशरी’ पर्यायावर क्लिक करा किंवा ‘आयुष्मान ॲप’चा वापर करा.
ही माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन प्रत्येक नागरिकांनी आपले आयुष्मान कार्ड त्वरित तयार करून घ्यावे.








