राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार? शालेय शिक्षण विभागाने सांगितली अधिकृत तारीख New Academic Year School Start 2025

By MarathiAlert Team

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Academic Year School Start 2025 शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता महाराष्ट्रातील इतर सर्व विभागांमध्ये सोमवार, १६ जून, २०२५ रोजी होणार आहे. विदर्भात मात्र शाळा सोमवार, २३ जून, २०२५ पासून सुरू होतील. शालेय शिक्षण विभागाने ही माहिती दिली असून, शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुख्य सचिवांकडून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी महत्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीतील ठळक मुद्दे जाणून घेऊया.

New Academic Year School Start 2025

‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रमाचा उद्देश: शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, राज्यमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आपापल्या जवळील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भेट देतील.

या भेटीदरम्यान, ते विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत शालेय गणवेश आणि इतर सोयी-सुविधांचा आढावा घेतील. तसेच, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवक यांच्याशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश कसा वाढेल, यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवतील.

मुख्य सचिवांकडून आढावा आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी:

राज्यातील लोकप्रतिनिधींबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळांना भेट द्यावी, याबाबत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नुकताच आढावा घेतला. त्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा स्तरावरील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजना सुचवण्यासही त्यांनी सांगितले.

‘निपुण महाराष्ट्र अभियान’ आणि पालकांशी संवाद:

विद्यार्थ्यांमध्ये संख्याज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी राज्यात ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ राबवले जात आहे. या अभियानांतर्गत, दुसरी ते पाचवीच्या वर्गातील किमान ७५% विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेनुसार अध्ययन क्षमता प्राप्त करणे हे उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमात पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी, शासनाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमात पालकांशी संवाद साधतील. याशिवाय, सर्व अधिकाऱ्यांना ‘दत्तक शाळा’ घेण्याची जबाबदारी दिली असून, सचिवांनीही पुढाकार घेऊन राज्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन यांनी केली आहे.

भेटीचा उद्देश आणि अपेक्षित परिणाम:

शाळांना भेट देताना मान्यवर शाळेतील भौतिक सुविधांचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या खेळांच्या सुविधा, पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी आणि प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेंतर्गत मिळणारा पोषण आहार यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करतील.

या भेटीमुळे समाज, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होईल, असा विश्वास श्रीमती कुंदन यांनी व्यक्त केला आहे. तसेच, यामुळे बालकांना आत्मविश्वासाने व्यक्त होण्याची आणि दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!