राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत नियमित कर्मचारी म्हणून सेवा समायोजन करण्यात आलेल्या राज्यातील १५ हजार कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात गारगोटी, जि. कोल्हापूर येथे अनौपचारिक कार्यक्रमात महायुती सरकारनी घेतलेल्या या निर्णयासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

दिनांक 25 जून 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठकीच्या तारखेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तांत्रिक खंड वगळून सलग 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या अशा एकूण 15,010 कर्मचाऱ्यांना एकवेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदांवर नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यानिमित्ताने कृतज्ञता सोहळ्याचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अधिसंख्य पदांवर समायोजन शासन निर्णयातील ठळक 10 मुद्दे
- राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अभिसंख्य (Supernumerary) पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- 25 जून 2026 रोजीपर्यंत तांत्रिक खंड वगळून 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या 15,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
- संबंधित कंत्राटी पदांची नियमित मंजूर पदांशी समकक्षता निश्चित करून त्यानुसार वेतनश्रेणी ठरवली जाणार आहे.
- समकक्ष वेतनश्रेणी निश्चित करताना 7 व्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी विचारात घेतली जाईल.
- कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतनश्रेणीतील किमान मूळ वेतन, महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता देण्यात येईल.
- सध्या मिळणारे वेतन संरक्षित राहील.
- या कर्मचाऱ्यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना (ACP/MACP) तसेच निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही.
- ही अभिसंख्य पदे व्यक्ती-सापेक्ष असतील. कर्मचारी सेवानिवृत्त, राजीनामा, मृत्यू किंवा अन्य कारणाने सेवा सोडल्यानंतर ती पदे आपोआप रद्द होतील आणि त्यावर नवीन नियुक्ती होणार नाही.
- या कर्मचाऱ्यांसाठी कमाल सेवावयोमर्यादा 58 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
- या निर्णयामुळे राज्य शासनावर दरवर्षी अंदाजे ₹1,153.60 कोटी इतका अतिरिक्त वेतन खर्च होणार असून त्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याचे आभार व्यक्त केले.

NHM कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदांवर शासन सेवेत समायोजन; शासन निर्णय
या प्रसंगी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, माजी आमदार श्री. उल्हास पाटील, श्री. मदन देसाई, श्री. कल्याण निकम, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. स्वप्निल गोसावी, श्री. सतीश सवदे, श्री. संजय पाटील, श्री. राहुल कोकणे तसेच राज्यभरातील मोठ्या संख्येने आरोग्यसेविका भगिनी, अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील संघटना प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.








