School Admission Certificates: शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र किंवा इतर महत्त्वाचे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना अनेकदा सरकारी कार्यालये किंवा आपले सरकार सेवा केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आणि प्रवेश प्रक्रियेतही विलंब होतो. हीच अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आवश्यकतेनुसार विशेष शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना शाळेमध्येच आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने 22 जून 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे आणि दाखले सहज उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित तालुका, ग्रामपंचायत किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून निश्चित दिवशी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची कामे प्राधान्याने केली जाणार आहेत.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाण्याची गरज कमी होईल. प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध होतील. तसेच शाळेचे तास बुडणार नाहीत आणि पालकांचीही धावपळ कमी होईल. शासनाने ही सुविधा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष मोहीम स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत.
- जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यकतेनुसार विशेष शिबिरे आयोजित करावीत.
- संबंधित तालुका, ग्रामपंचायत किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत निश्चित दिवशी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे तयार करण्याचे काम प्राधान्याने करावे.
- प्रवेश कालावधीत किंवा प्रमाणपत्रांची मागणी वाढलेल्या काळात विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन करावे.
- आपले सरकार सेवा केंद्र चालक, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून विद्यार्थ्यांना वेळेत सेवा उपलब्ध करून द्यावी.
- या सूचनांची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावी.
या निर्णयामागील कारण काय?
शासनाच्या निदर्शनास आले की, शालेय प्रवेशाच्या काळात विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. हे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना अनेक ठिकाणी जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते आणि काही वेळा त्यांना शाळेच्या तासांनाही मुकावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे शासन परिपत्रक इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागामार्फत 22 जून 2026 रोजी जारी करण्यात आले असून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
| शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्याबबत नवीन | शासन निर्णय |









