Pavitra Portal Teacher Recruitment: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक आणि शिक्षक पदांची भरती पवित्र पोर्टल (Pavitra Portal) माध्यमातून पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. यंदा राज्यभरातील एकूण 30 हजार 209 रिक्त शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पात्र उमेदवारांनी निश्चित मुदतीत पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो लॉक करण्याचे आवाहन शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी केले आहे.
या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांची निवड शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) च्या आधारे करण्यात येत आहे. ही ऑनलाइन परीक्षा 27 मे ते 5 जून 2025 या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण 2 लाख 28 हजार 808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 11 हजार 308 उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले, तर 1 लाख 70 हजार 108 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र (Self Certification) प्रक्रिया पूर्ण केली आहे.
पवित्र पोर्टलवरील जाहिरात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध विभागांकडून एकूण 30 हजार 209 रिक्त पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषदांच्या 13 हजार 351, महानगरपालिकांच्या 1 हजार 954, नगरपालिका आणि नगर परिषदांच्या 280, खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 12 हजार 148, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील 2 हजार 421 तसेच शासकीय विद्यानिकेतनमधील 56 पदांचा समावेश आहे.
या एकूण पदांपैकी 19 हजार 881 पदे मुलाखतीशिवाय (Without Interview) भरली जाणार आहेत, तर 10 हजार 328 पदे मुलाखतीसह (With Interview) भरली जाणार आहेत. मुलाखतीसह भरल्या जाणाऱ्या सर्व पदांचा समावेश खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीमध्ये आहे.
इयत्तानिहाय पदांचा विचार केला असता, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी 14 हजार 320 पदे, इयत्ता सहावी ते आठवीसाठी 10 हजार 12 पदे, इयत्ता नववी व दहावीसाठी 5 हजार 513 पदे, तर इयत्ता अकरावी व बारावीसाठी 364 पदे उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक भरती एकाच प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे.
भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर पदनिहाय पसंतीक्रम (Preference Order) निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी आवश्यक ऑनलाइन सुविधा 6 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपल्या पसंतीनुसार पदांचा क्रम निश्चित करून तो 11 ऑगस्ट 2026 पर्यंत अनिवार्यपणे लॉक करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीनंतर मुलाखतीशिवायच्या पदांसाठी गुणवत्तायादी (Merit List) प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी स्पष्ट केले.
भरती प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण, सूचना, मागणी किंवा तक्रार असल्यास उमेदवारांनी edupavitra25@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही शालेय शिक्षण आयुक्तांनी केले आहे.
राज्यातील शिक्षक भरतीची ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून, हजारो पात्र उमेदवारांना शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शाळांमध्ये शिक्षक म्हणून संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी पसंतीक्रम नोंदवून तो लॉक करण्यास प्राधान्य द्यावे.







