MahaRojgar Melava 2026-27: राज्यातील युवक-युवतींना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षात १ हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राज्यभर हे रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीच्या बैठकीत मंत्री लोढा यांनी सांगितले की, रोजगार मेळाव्यांची माहिती राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील गरजू तरुणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत सामाजिक संस्था, महाविद्यालये आणि विविध घटकांचा सहभाग वाढवला जाणार आहे.
आयटीआयसोबत इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही संधी
मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले की, केवळ आयटीआय (ITI) विद्यार्थ्यांपुरते रोजगार मेळावे मर्यादित न ठेवता इतर महाविद्यालयांतील विद्यार्थी, कौशल्यवृद्धी (Upskilling) करू इच्छिणारे तरुण तसेच विविध सामाजिक संस्थांमार्फत युवकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवली जाईल.
यासोबतच तरुणांना रोजगाराचे महत्त्व, करिअर नियोजन आणि स्वरोजगाराच्या संधींबाबत तज्ज्ञ व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांच्या (NGO) माध्यमातून समुपदेशनही करण्यात येणार आहे.
रोजगार मेळाव्यापूर्वी दोन आठवड्यांचे प्रशिक्षण
रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी विशेष पूर्व-रोजगार प्रशिक्षण (Pre-Employment Training) आयोजित करण्यात येणार आहे.
पहिल्या आठवड्यात खालील बाबींवर भर दिला जाईल:
- पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट (Personality Development)
- शिष्टाचार (Etiquette)
- प्रभावी बायोडाटा (Resume) तयार करणे
- मुलाखत व संभाषण कौशल्य (Communication Skills)
दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या Aptitude Test नुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. त्यामध्ये:
- इलेक्ट्रिसिटी (Electricity)
- प्लंबिंग (Plumbing)
- रिसेप्शनिस्ट (Receptionist)
- मार्केटिंग (Marketing)
यांसारख्या क्षेत्रांतील प्रात्यक्षिकांचा समावेश असेल.
प्रशिक्षणामुळे नोकरी मिळण्याचे प्रमाण वाढणार
मंत्री लोढा यांनी सांगितले की, केवळ रोजगार मेळावे घेणे पुरेसे नसून उमेदवारांना पूर्वतयारी करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास रोजगार मेळाव्यात निवड होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
यासाठी विभागीय अधिकारी, प्रदेश समन्वय समित्या आणि संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून रोजगार मेळावे अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मंत्रालयात झालेल्या राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीच्या बैठकीस राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष डॉ. रणजीत पाटील, सदस्य डॉ. सरोजिनी राऊत, रविंद्र देशपांडे, विशाल टिब्रेवाल, जयेश ढाके, राहुल खोले तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ. अमित सैनी आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत डॉ. अमित सैनी यांनी रोजगार मेळाव्यांच्या नियोजनाची माहिती दिली, तर समितीच्या सदस्यांनी उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी विविध सूचना मांडल्या.
सध्या राज्यात २०२६-२७ या कालावधीत १,००० रोजगार मेळावे आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक मेळाव्याची जिल्हानिहाय तारीख, ठिकाण आणि नोंदणीची माहिती टप्प्याटप्प्याने Mahaswayam पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे हे पोर्टल नियमितपणे तपासत राहणे योग्य ठरेल.
रोजगार मेळाव्याची माहितीसाठी | Mahaswayam Portal








