महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २ एप्रिल २०२६ रोजी रात्रशाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे रात्रशाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शासनाने यापूर्वी १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेबाबत सुधारित धोरण लागू केले होते. नवीन स्पष्टीकरणानुसार, हे सुधारित धोरण आता राज्यातील सर्व रात्रशाळांनाही लागू करण्यात आले आहे. यामुळे रात्रशाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती आणि संचमान्यतेच्या नियमांमध्ये आता एकवाक्यता येणार आहे.
या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, रात्रशाळेत कार्यरत असताना अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन हे रात्रशाळेतच करणे ग्राह्य धरले जाणार आहे. विशेषतः ज्या रात्रशाळांमध्ये नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले ‘एकल शिक्षक’ (Single Teacher) अतिरिक्त ठरले आहेत, त्यांना इतर रात्रशाळांमध्ये समावून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिक्षण विभागाने यासंदर्भात माध्यमिक शिक्षण संचालक आणि सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना अन्य रात्रशाळांमध्ये रिक्त पदांवर समावून घेण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे रात्रशाळांमधील शिक्षकांच्या नोकरीला संरक्षण मिळाले असून, त्यांच्या सेवा सातत्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे.









