राज्यातील अनाथ, निराश्रित आणि एकल पालक (आई किंवा वडील नसलेल्या) असलेल्या गरजू मुलांना हक्काचा आधार देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून आता अशा सर्व पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य मिळवून दिले जाणार आहे. या योजनेच्या पात्र लाभयार्थ्याना दरमहा रु. 2,250 म्हणजेच वार्षिक रु. 27,000 इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
मंत्रालयात नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा केली असून, राज्यातील एकही पात्र बालक या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असे स्पष्ट केले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी पात्र लाभार्थी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी खालील पात्र लाभार्थी अर्ज करू शकतात.
- अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी बालके दत्तक देणे शक्य नाही अशी बालके.
- एक पालक असलेली बालके, (एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट, पालक विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे, इ. कारणांमुळे कुटुंब विघटीत झालेली, एक पालक असलेली बालके).
- कुटुंबातील तणाव ,तंटे , वादविवाद ,न्यायालयीन वाद अशा सारख्या कौटुंबिक संकटात बाधित बालके.
- कुष्ठरुग्ण पालकांची बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, तुरुंगात असलेल्या पालकांची बालके, एच. आय. व्ही. ग्रस्त पालकांची बालके, कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने बाधित पालकांची बालके.
- तीव्र मतीमंद बालके, एच. आय. व्ही. ग्रस्त किंवा कॅन्सरग्रस्त बालके, 40 टक्के पेक्षा अधिक अपंगत्व असलेली, अंध, दिव्यांग बालके, भिक्षा मागणारी बालके, पोक्सो अधिनियमांतर्गत बळी पडलेली बालके.
- तीव्र कुपोषित बालके, सॅमबालके, दुर्धर आजार असलेली बालके, व्यसनाधीन बालके, विविध प्रकारच्या दंगलीनी प्रभावित झालेली बालके, कोविड सारख्या रोगाच्या प्रादुर्भावाने दोन्ही / एक पालक गमावलेली बालके.
- नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन्ही / एक पालक गमावलेली बालके, बालविवाहाला बळी पडू शकणारी बालके, विधी संघर्षग्रस्त बालके, दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके.
- रस्त्यावर राहणारी, शाळेत न जाणारी, बालकामगार बालके.
- कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुंतलेल्या पालकांची बालके.
- भिक्षेकरी गृहात दाखल पालकांची बालके (याबाबत भिक्षेकरी गृहाच्या अधिक्षक यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.)
वरील पात्र लाभार्थी बालक हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी पात्र असतील. यासाठी तुम्ही महिला व बालसंगोपन योजनेचा सुधारित शासन निर्णय डाउनलोड करू शकता.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना लाभार्थी निवडीसाठी आवश्यक कागदपत्रे
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम 2 (14) व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, 2018 नुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालके या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील. या योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे.
- लाभार्थ्याचा रहिवाशी दाखला (तलाठी / ग्रामसेवक / नगरसेवक / सरपंच यांचेकडून निर्गमित दाखला)
- लाभार्थ्याचे व पालकाचे आधार कार्ड (छायांकीत प्रत)
- लाभार्थ्याचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असल्याबाबतचा तलाठी / तहसीलदार यांचा दाखला
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबास प्राधान्य (रेशन कार्ड)
- आई / वडिलांचा अथवा दोघांच्या मृत्यू दाखला
- पालक / आई/वडील यांचे समवेत घरासमोरचा फोटो.
- बालकांचा जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यास विलंब होत असल्यास मागच्या इयत्तेची गुणपत्रक किंवा बोनाफाइड प्रमाणपत्र
- 3 ते 18 वयोगटातील लाभार्थी हा शिक्षण घेत असल्यास (शाळेची गुणपत्रिका/ बोनाफाईड सोबत जोडावे.)
- बँक अकाऊंट क्रमांक (पासबुकची छायांकित प्रत)
- बालकाचा सांभाळ करत असल्याबाबतचे जैविक पालकांव्यतिरीक्त संगोपन कर्त्याचे किंवा नातेवाईकांचे हमीपत्र जोडावे.
बालक व पालक बाल कल्याण समितीसमोर हजर राहणे आवश्यक आहे. कुमारी मातेचे पाल्य, कौटुंबिक हिंसाग्रस्त महिलेचे पाल्य, आई किंवा वडील सोडून गेलेली बालके, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके, दोन्ही पालक अपंग असलेली बालके यांचे करिता प्रकरणपरत्वे पोलीस अहवाल, वैद्यकीय प्रमाणपत्र व ग्रामसेवक यांचा दाखला,बालकांचा सांभाळ करणारी व्यक्ती व्यसनाधीन नसल्याबाबतचा बालकाचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचा सामाजिक तपासणी अहवाल.
“भिक्षेकरी गृहात दाखल पालकांच्या बालकांकरिता (भिक्षेकरी गृहाच्या अधिक्षक यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.) एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट, पालक विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. सर्वसामान्यपणे एका कुटुंबातील दोन बालकांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. तसेच एका कुटुंबात दोनच बालकांना सांभाळ करण्यासाठी ठेवता येईल.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना (Balsangopan Yojana) आणि त्याचे फायदे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन ही योजना प्रामुख्याने अशा मुला-मुलींसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे ज्यांना विशेष काळजी आणि संरक्षणाची गरज आहे.
यामध्ये अनाथ, बेघर, निराश्रित किंवा ज्यांच्या कुटुंबात कमावणारी मुख्य व्यक्ती नाही अशा १८ वर्षांपर्यंतच्या बालकांचा समावेश होतो.
बदलत्या काळानुसार सरकारने या योजनेच्या अनुदानात वाढ केली असून, आता पात्र असणाऱ्या प्रत्येक बालकाला दरमहा २२५० रुपयांचे परिपोषण अनुदान थेट दिले जाते.
बाल संगोपन योजना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे संपूर्ण माहिती
सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे २ लाख २३ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी असे आहेत ज्यांनी आई, वडील किंवा दोन्ही पालकांना गमावले आहे. या सर्व गरजू मुलांपर्यंत ही बालसंगोपन योजना (Balsangopan Yojana) प्रभावीपणे पोहोचवणे हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.
पात्र विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मुख्याध्यापक घेणार पुढाकार
अनेकदा दुर्गम भागातील किंवा गरीब कुटुंबातील गरजू बालके माहितीअभावी किंवा कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे अशा कल्याणकारी योजनांपासून वंचित राहतात. हीच अडचण दूर करण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी विशेषतः जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या शाळेत शिकणाऱ्या अशा पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन ते महिला व बालविकास विभागाकडे सादर करण्याची महत्त्वाची जबाबदारी आता शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली आहे.
सध्या राज्यात सुमारे १ लाख ५९ हजार विद्यार्थी या बालसंगोपन योजना (Balsangopan Yojana) अंतर्गत लाभ घेत आहेत.
आधार कार्डशी संलग्न असलेल्या या योजनेद्वारे शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग एकत्रितपणे समन्वय साधून काम करणार आहेत, ज्यामुळे बोगस प्रकरणांना आळा बसेल आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचेल.
शाळांमध्ये अंगणवाड्या भरणार आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणार
मंत्रालयातील या बैठकीत केवळ आर्थिक मदतीवरच नव्हे तर मुलांच्या पूर्व-प्राथमिक शिक्षण आणि आरोग्यावरही विशेष भर देण्यात आला.
ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्गखोल्या रिकाम्या आहेत, त्या खोल्या अंगणवाड्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील, ज्यामुळे लहान मुलांना शिकण्यासाठी चांगली जागा मिळेल. यासोबतच, प्री-स्कूल अभ्यासक्रमासाठी पात्र असलेल्या अंगणवाडी सेविकांना शालेय शिक्षण विभागाकडून ६ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण तातडीने दिले जाणार आहे.
मुलांच्या आरोग्याचा विचार करता, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. ही तपासणी थेट पालकांच्या समोर केली जाणार असून, त्यावरून प्रत्येक विद्यार्थ्याची एक स्वतंत्र आरोग्य पत्रिका तयार होईल. यामुळे मुलांच्या आरोग्याचा जुना इतिहास समजून त्यांच्यावर योग्य वेळी उपचार करणे शक्य होणार आहे.
अधिक माहितीसाठी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना 2026 शासन निर्णय डाउनलोड करा










