Krishi Vibhag Padnam Badal GR महाराष्ट्र शासनाने कृषी विभागात कार्यरत कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्या पदनामांमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता कृषी पर्यवेक्षक ‘उप कृषी अधिकारी’ आणि कृषी सहाय्यक ‘सहाय्यक कृषी अधिकारी’ म्हणून ओळखले जातील. हा निर्णय ५ जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे.
Krishi Vibhag Padnam Badal GR
गेल्या काही काळापासून विविध संघटनांकडून कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्या पदनामात बदल करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीवर विचार करून आणि कृषी आयुक्तांनी केलेल्या प्रस्तावानुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या २७ मे, २०२५ रोजीच्या बैठकीत या पदनाम बदलास मान्यता देण्यात आली.
या पदनाम बदलामागील मुख्य कारणे:
- अॅग्रीस्टॅक प्रकल्प: केंद्र शासनाचा ‘अॅग्रीस्टॅक‘ हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने आणि परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी एक डिजिटल फाउंडेशन स्थापित केले जात आहे.
- कृषी सहाय्यकांची भूमिका: ग्राम स्तरावर या प्रकल्पाचे महत्त्वाचे कामकाज करण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकांवर सोपवण्यात आलेली आहे. या वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि कार्याची व्याप्ती लक्षात घेऊन पदनाम बदल आवश्यक होता.
महत्वाच्या अटी:
शासनाने हा पदनाम बदल काही अटींच्या अधीन राहून मंजूर केला आहे:
- वेतनश्रेणीत बदल नाही: या पदनाम बदलामुळे भविष्यात वेतनश्रेणीत कोणतीही वाढ विचारात घेतली जाणार नाही. तसेच, वेतनत्रुटी समितीपुढे वेतनश्रेणी/वेतनस्तर देण्याबाबत कोणतीही मागणी करता येणार नाही. कृषी पर्यवेक्षक पदाचा सध्याचा वेतन स्तर एस-१३ (रु. ३५४००-११२४००) आणि कृषी सहायक पदाचा वेतन स्तर एस-८ (रु. २५५००-८११००) हाच राहील.
- संवर्गात बदल नाही: पदनाम बदलानंतरही सध्याच्या गट-क संवर्गात कोणताही बदल होणार नाही आणि गट बदलासंदर्भात कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही.
- सेवाप्रवेश नियम: नवीन पदनामांसाठी सध्याचेच सेवाप्रवेश नियम लागू राहतील. यासाठी नव्याने सेवाप्रवेश नियम तयार केले जाणार नाहीत.
- कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या: पदनाम बदलल्यानंतरही कर्मचाऱ्यांना त्यांची सध्याची सर्व कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय डाउनलोड करा