Pavitra Portal Shikshak Bharati: महारष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २ एप्रिल २०२६ रोजी शिक्षक पदभरती प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे बदल करणारे दोन निर्णय जाहीर केले आहेत. या सुधारणांमुळे पवित्र पोर्टलमार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गुणवत्ताधारकांसाठी सोयीची होणार आहे.
Pavitra Portal Shikshak Bharati प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या मर्यादेत वाढ
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलमार्फत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आता निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी पूर्वीपेक्षा जास्त प्राधान्यक्रम (Preferences) लॉक करता येणार आहेत.
शासनाने जारी केलेल्या शुद्धीपत्रकानुसार, ‘मुलाखतीशिवाय’ या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवार आता जास्तीत जास्त १०० प्राधान्यक्रम लॉक करू शकतील.
यापूर्वी ही मर्यादा केवळ ५० पर्यंत मर्यादित होती. तसेच, ‘मुलाखतीसह’ या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारांना ५० प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुभा देण्यात आली आहे.
उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम पोर्टलवर उपलब्ध होतील, त्यापैकी वरील मर्यादेनुसार ते आपली निवड निश्चित करू शकतात.
निवडीसाठी नवीन गुणदान पद्धत आणि मानक कार्यपद्धती
खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘मुलाखतीसह’ शिक्षक पदभरतीचा पर्याय निवडणाऱ्या संस्थांसाठी शासनाने सुधारित मानक कार्यपद्धती (SOP) लागू केली आहे.
या नवीन पद्धतीनुसार उमेदवारांची निवड आता एकूण १०० गुणांच्या आधारावर केली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक ७५ गुणांचा भारांश हा ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (TAIT) मधील गुणांना देण्यात आला आहे.
उमेदवाराला चाचणी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या ७५ टक्के गुण या निवडीसाठी ग्राह्य धरले जातील. उर्वरित गुणांमध्ये व्यावसायिक अर्हतेसाठी ८ गुण, शैक्षणिक अर्हतेसाठी ७ गुण आणि प्रत्यक्ष मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी १० गुण राखीव ठेवण्यात आले आहेत.
मुलाखत प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी अध्यापन कौशल्याचेही सूक्ष्म विभाजन करण्यात आले आहे. यामध्ये विषय ज्ञान आणि उपयोजन क्षमतेसाठी २ गुण, पाठाची पूर्वतयारी आणि शैक्षणिक साहित्याच्या वापरासाठी २ गुण, तर विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पाठाच्या पुनरावलोकनासाठी १ गुण निश्चित केला आहे.
मुलाखतीमध्ये उमेदवाराचे व्यक्तिमत्व आणि संभाषण कौशल्य तपासण्यासाठी ५ गुण देण्यात आले आहेत. या १०० गुणांच्या प्रक्रियेत जो उमेदवार सर्वाधिक गुण मिळवेल, त्याचीच निवड करणे संस्थेसाठी आता बंधनकारक असणार आहे.
टाय-ब्रेकर आणि नियुक्तीचे नियम
जर दोन किंवा अधिक उमेदवारांना १०० पैकी समान गुण प्राप्त झाले, तर निवडीसाठी वयाची अट विचारात घेतली जाईल. अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे, त्याला निवडीमध्ये प्राधान्य दिले जाईल.
वय देखील समान असल्यास, उमेदवाराचे इयत्ता १२ वी मधील गुण निवडीसाठी आधार मानले जातील. संबंधित शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांनी या सर्व गुणांकन प्रक्रियेची खातरजमा केल्याशिवाय नियुक्तीस मान्यता देऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
ही नवीन प्रक्रिया ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५’ आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी लागू राहील.
अधिक माहितीसाठी









