शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी नवीन वर्षाची सुरुवात एका मोठ्या आनंदाच्या बातमीने झाली आहे! राज्य सरकारने पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता केवळ सध्याच्याच नाही, तर भविष्यातील रिक्त जागांवरही नोकरीची संधी मिळणार आहे. यामुळे भरती प्रक्रियेला मोठा वेग येणार असून, नेमका काय आहे हा शासन निर्णय? त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल? जाणून घ्या सविस्तर…
पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबाबत राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय
पवित्र पोर्टलमार्फत राबवण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये (Pavitra Portal Teacher Vacancy in Maharashtra) आता अधिक गती येणार असून, शासनाने रिक्त पदांच्या भरतीबाबत एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १ जानेवारी २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, आता केवळ सध्याच्या रिक्त जागाच नव्हे, तर आगामी शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस रिक्त होणाऱ्या जागांचाही विचार भरतीसाठी केला जाणार आहे.
आता ‘या’ तारखेपर्यंतच्या रिक्त जागा भरल्या जाणार; शासनाचा GR आला
राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षक भरती सुरू आहे.
नवीन आदेशानुसार, शासनाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या अखेरीस, म्हणजेच मे २०२६ अखेरपर्यंत सेवानिवृत्ती किंवा इतर कारणांमुळे रिक्त होणाऱ्या संभाव्य जागा विचारात घेण्यास मान्यता दिली आहे.
याचाच अर्थ, मे २०२६ पर्यंत जे शिक्षक निवृत्त होणार आहेत, त्यांच्या जागी नवीन शिक्षक भरण्याची प्रक्रिया आताच नियोजित केली जाईल. यामुळे (Pavitra Portal Teacher Vacancy in Maharashtra) प्रक्रियेत सातत्य राहणार असून विद्यार्थ्यांना वेळेवर शिक्षक मिळणे शक्य होणार आहे.
या निर्णयामागील मुख्य कारणे
१. RTE कायदा: ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९’ नुसार कोणत्याही शाळेत १० टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त ठेवता येत नाहीत.
२. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणे: दरवर्षी अनेक शिक्षक निवृत्त होतात. अशावेळी नवीन शिक्षक येईपर्यंत मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून संभाव्य रिक्त पदे आधीच विचारात घेणे गरजेचे होते.
भरतीचा आधार काय असणार?
ही संपूर्ण भरती प्रक्रिया ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५’ (TAIT-2025) च्या निकालावर आधारित असणार आहे. पूर्वीच्या (२१ जून २०२३ च्या) शासन निर्णयातील तरतुदींनुसार ८०% पर्यंत रिक्त पदे भरण्याच्या मर्यादेत राहूनच ही कार्यवाही केली जाणार आहे.
थोडक्यात, शासनाच्या या निर्णयामुळे (Pavitra Portal Teacher Vacancy in Maharashtra) संदर्भातील चित्रात अधिक स्पष्टता आली असून, शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी शासन निर्णय पहावा.









