महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पवित्र पोर्टलमार्फत राबवण्यात येणाऱ्या शिक्षक पदभरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. या भरती प्रक्रियेतील काही जाचक अटी शिथिल करून प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Pavitra Portal Shikshak Bharti) प्रक्रियेत नेमके कोणते बदल झाले आहेत, हे आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती सुधारित कार्यपद्धती
दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत.
१. प्राधान्यक्रम (Preferences) लॉक करण्याबाबत नवीन नियम शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना शाळांचे पसंतीक्रम किंवा प्राधान्यक्रम देणे बंधनकारक असते. जुन्या नियमांनुसार उमेदवार उपलब्ध असलेल्या सर्व जागांसाठी अमर्यादित पसंतीक्रम देऊ शकत होते, ज्यामुळे प्रक्रियेत गुंतागुंत वाढत होती.
मात्र, आता नवीन सुधारित तरतुदीनुसार, उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार ‘मुलाखतीशिवाय’ आणि ‘मुलाखतीसह’ या दोन्ही प्रकारच्या निवडीसाठी सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. परंतु, सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील. ही मर्यादा दोन्ही निवड प्रकारांसाठी स्वतंत्रपणे लागू असेल, ज्यामुळे उमेदवारांना विचारपूर्वक आणि मोजकेच पसंतीक्रम द्यावे लागतील.
२. उमेदवारांची निवड आणि गुणांची वैधता (Pavitra Portal Shikshak Bharti) प्रक्रियेत एका टप्प्यात निवड झालेल्या उमेदवाराला पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी अर्ज करायचा असल्यास अनेक अडचणी होत्या. आता सुधारित नियमानुसार, उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून ‘एकदा’ निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील. मात्र, उमेदवार पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत पुन्हा अर्ज करू शकतील.
३. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक वयोमर्यादेबाबत उमेदवारांमध्ये नेहमीच संभ्रम असतो. नवीन जीआरनुसार, ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) मधील गुणांच्या आधारे पदभरती होत आहे, त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय विचारात घेतले जाईल. म्हणजेच, जाहिरात कधीही आली तरी, वयोमर्यादा ही परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेवर आधारित असेल.
४. सेमी इंग्रजी शाळांसाठी पात्रता निकषात बदल इयत्ता १ ली ते ५ वी या गटासाठी सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवण्यासाठी इंग्रजी माध्यमातून डी.टी.एड. (D.T.Ed.) असणे आवश्यक असते. परंतु, जर असे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर आता शासनाने मोठा दिलासा दिला आहे.
अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी पुन्हा जाहिरात देऊन, इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता पूर्ण न केलेल्या; परंतु १२ वी विज्ञान किंवा बी.ए./एम.ए. (इंग्रजी) किंवा बी.एस्सी/एम.एस्सी अशी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात आली आहे. यामुळे सायन्स आणि इंग्रजी विषय असलेल्या उमेदवारांना (Pavitra Portal Shikshak Bharti) मध्ये मोठी संधी मिळणार आहे.
सदरचे बदल हे ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५’ (TAIT-2025) नुसार होणाऱ्या पदभरतीसाठी आणि त्यानंतरच्या सर्व परीक्षांसाठी लागू राहतील. त्यामुळे जुन्या भरती प्रक्रियेतील गुंतागुंत कमी होऊन, आगामी भरती अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे.
अधिकृत माहितीसाठी : मूळ शासन निर्णय डाउनलोड करा







